Saturday, January 5, 2013

पटनायकांचं नेमकं कुठे चुकलं?

पटनायकांचं नेमकं कुठे चुकलं? अरूप पटनायक गेले. त्यांची गच्छंती अटळच होती. त्यांच्या स्वत:हून दाखवलेल्या निष्क्रियतेची त्यांना किंमत चुकवावी लागली. मुंबईत झालेली दंगल आणि त्यायोगे झालेला हिंसाचार सर्वांना माहीतच आहे. त्याबद्दल अनेकांचं लिहून बोलून झालेलं आहेच. हा लेखन प्रपंच फक्त पटनायकांची बाजू सांगण्याचा आहे. (त्याची वकिली करण्याचा नाही.) प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला मनाजोगते आणि स्वतंत्रपणे काम करणे शक्य नसते. अनेक अधिकाऱ्याना नोकरीतून बाहेर पडल्यावर कंठ फुटतो, मग ते सनदी प्रशासकीय अधिकारी असोत अथवा पोलीस दलातले. अनेक पत्रकारांना ऑफ द रेकोर्ड अश्या अनेक घटनांची कल्पना असते. वर्तमानपत्रातल्या 'नाव न घेण्याच्या अटीवर' अश्या अनेक गोष्टी आणि अनेक मतांचा प्रत्यय येथे असतो. त्यामुळे अश्या परिस्थितीत काम करणाऱ्या पटनायक यांना स्वत:हून काही करता येईल अशी हमीच नाही. आता त्या दिवसाबद्दल बोलू. गृहीत धरून चला की पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला. (लाठीमार तो लाठीमार, सौम्य आणि उग्र या गोष्टी येथे गौण ठरतात. कारण येथे भावना काम करतात कायदा आणि विवेक नाही). किंवा हत्यारी पोलिसांनी शस्त्रास्त्रे चालविली. पोलिसांची शस्त्रे नक्कीच जीवनदायी नसतात. आणि AK ४७ किंवा sLR ही काही साधीसुधी शस्त्रे तर नक्कीच नाहीत. पटनायकांच्याच भाषेत सांगायचं झाला तर १९९२-९३ सारखी मुडद्यांची रस पडली असती. क्षणभर असं समजू पोलिसांनी शौर्य दाखवले आणि गोळीबार करून आणि तेवढ्यापुरती दंगल आटोक्यात आणली असती. म्हणजेच आसाम आणि म्यानमारपाठोपाठ मुंबईत पण अल्पसंख्याकांवर अत्याचार चालू आहेत असा संदेश देशभर नक्कीच पोहोचला असता. त्यामुळे काय झाले असते याची कल्पनाही कदाचित करवणार नाही. काँग्रेसपुरतं बोलायचं झाल्यास त्यांची मतं गेली असती. पण जर देशभर पुन्हा वातावरण गरम झालं असतं तर? तर आता जी देशभक्ती, त्याग, निष्ठा, सर्वधर्मसमभाव, बंधुभाव यांचे धडे देत बसणारी महेश भट, तिस्ता सेटलवाड, आमीर खान, शबाना आझमी पूजा भट, हसन मुश्रीफ, आणि २६/११ चा हल्ला आणि हेमंत करकरे यांची हत्या संघपरिवाराने घडवली असा प्रचार आपल्या कृतीतून करणारे दिग्विजय सिंघ किंवा अब्दुल रेहमान अंतुले यांनी थोबाडं गप्प ठेवली आहेत त्यांची दुकानदारी सुरु झाली नसती का? त्यांनी नक्कीच अरूप पटनायक यांना नरेंद्र मोदींचे हस्तक मानले असते. या देशात कसा अल्पकासंख्याकांचा गळा घोटाळा जातो हे सांगायला यांना मिडिया आयता मिळतोच. त्यांनी पटनायकांच्या बदलीसाठी दबाव वाढवला असता. आणि त्यांची गच्छंती अटळच होती. फक्त ते जनतेच्या रेट्यामुळे गेले हेच काय ते या मुंबापुरीच नशीब. मग पटनायक याचं कुठे चुकलं? त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांनी उपलब्ध जमावाला शांततेचा आवाहन केलं. आणि सुहास्य वदनाने त्यांनी माध्यमांना परिस्थिती नियंत्रणाखाली आल्याचं सांगितलं. ५० च्या आसपास पोलीस जखमी झाल्यावर आणि कळस म्हणजे महिला पोलिसांचा विनयभंग होण्यासारखे लांच्छनास्पद प्रसंग घडल्यावर पोलीस आयुक्तांनी बोलबच्चनगिरी दाखवायची काहीच गरज नव्हती. किमान त्यांनी मौन बाळगले असते तरीही पुढचा भडका उडाला नसता. जनसामान्यांची आकलन शक्ती कमीच असते. आणि विश्लेषण शक्ती अक्षरश: शून्य असते. कारण त्यासाठी चिंतन, मनन आणि सखोल विचार लागतो.तो त्यांच्याकडे नसतो. कारण त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. (मग हवी ती लोकल गाठून ऑफिसला कोण पोहोचणार? घर कोण चालवणार?) म्हणूनच ते जनसामान्य असतात, बुद्धीजीवी नसतात. TV वर दिसले ते हसतमुख आणि काही मुस्लीम नेत्यांना हात मिळवणारे आयुक्त. लोकांना पोलिसांकडून कळले ते दंगलखोरांना पकडून आणणाऱ्या पोलिसांनाच दमात घेणारे आयुक्त. याला नक्कीच परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे असे म्हणत नाहीत. सामान्य जनता याला लांगुलचालनच म्हणते आणि वर राज ठाकरे यांनी सभेची घोषणा केली की त्यांच्या विरोधात कारवाईच्या घोषणा करणाऱ्या पोलीस प्रमुख आणि गृहमंत्र्यांना जनता पक्षपाती म्हणते. यात जनतेची खरेच चूक आहे काय? आणि मुख्य म्हणजे पोलिसांवर हल्ला? मग आमचं काय? हा जनतेचा सवाल असतो. त्याची उत्तर व्यवस्थेकडून मिळत नाहीत. या प्रश्नाला अनेक पदर आहेत. त्या रझा अकादमीच्या सभेला परवानगी मिळाली कशी? मिळाली तर सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा का नव्हता? आणि मनसेच्या सभेला मात्र १५००० पोलीस का ठेवले गेले? ही जनतेच्या मनातली प्रश्न मंजुषा आहे. याची उत्तरे कधीच मिळणार नाहीत. कारण या देशात गुन्हेगाराला देलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही कारण कधी तो तमिळ (मुरुगन) तर कधी शीख (वूल्लर) तर कधी मुसलमान. येथे कायद्याचे नाही तर सेक्युलरवादाच्या बुरख्याआड सर्व धर्मांचे राज्य चालते. (म्हणजेच सर्वधर्मसमभाव). तुकोबांच्या शब्दात सांगायचे झाले तर देव्हारयावारी विंचू आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजारीचे (चपलेचे) काम अधमासी तो अधम सद्रक्षणाय खालानिग्रःणाय असं आपल्याकडे कधी होत नाही. जनता याला विटते आणि राज ठाकरेंच्या सभेला गर्दी करते.

No comments:

Post a Comment